- बसस्टॉप व ठाकरे गेट समोर, खर्र्याचे खुले “साम्राज्य”
- रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त……
- सुगंधीत तंबाखू बंदीला हरताळ? भद्रावती ऐतिहासिक नगरीला गालबोट……
थेट पूने- मुंबई रोजच खर्र्याचे पार्सल……
चंद्रपुर प्रतिनिधी :
संपूर्ण महाराष्ट्रात सुगंधीत तंबाखू विक्रीवर बंदी असतानाही भद्रावती शहरात खर्रा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील मुख्य बसस्टॉप आणि बाळासाहेब ठाकरे गेट समोर असलेल्या पानटपरीवर दिवसभर खर्रा घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असून त्यामुळे परिसरात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणाहून तयार होणारा खर्रा केवळ भद्रावती किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरताच मर्यादित नसून यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती तसेच थेट मुंबई-पुण्यापर्यंत पार्सलद्वारे पाठविला जात असल्याची चर्चा आहे. यामुळे भद्रावती खर्रा टपरी महाराष्ट्रभर झड़कत असुन भद्रावती ऐतिहासिक नगरीचे नावाला गालबोट लाऊन या व्यवसायाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बोलले जात आहे.
बस, ट्रॅव्हल्स आणि ग्राहकांमुळे कायम जाम
मुख्य बसस्टॉपसमोरील सर्विस रोडवर ग्राहकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. काही खासगी ट्रॅव्हल्स आणि एसटी बस चालकदेखील त्या ठिकाणी थांबत असल्याने प्रवासी खाली उतरून खर्रा खरेदी करतात. परिणामी परिसरात सतत वाहतूक कोंडी होत असून सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या गर्दीतून मार्ग काढणे कठीण होत असून अपघात सुद्धा झाले आहेत.
……………………….
“पैशाची माया” वाढली, नियम ठेवले धाब्यावर?
परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार, खर्रा विक्रीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याने संबंधित विक्रेत्याचा आत्मविश्वास वाढला असून “आपले कोणी काही बिघडवू शकत नाही” अशी भावना त्याच्यात निर्माण झाल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.
काही नागरिकांनी असा आरोपही केला की, पोलीस विभागातील बहुतेक कर्मचारी खर्रा खरेदीसाठी येत असल्याने विक्रेत्याला अप्रत्यक्ष पाठबळ मिळत आहे. त्यामुळे अन्न औषधी प्रशासन कारवाई करण्यास पूर्णतः टाळाटाळ करत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न
नगरपालिका, वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बसस्टॉप परिसरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे. मुख्य बसस्टॉप परिसर हा प्रवाशांच्या सोयीसाठी की खर्रा विक्रीसाठी? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुगंधीत तंबाखू विक्री, अतिक्रमण, अनधिकृत वाहन थांबे आणि वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

